शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी आमदारांच्या घरांसमोर टेम्भे पेटवून आंदोलन
बारामती मधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे एका कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कर्ज भरण्याचे आवाहन केले होते. इतकेच नाही तर याच वर्षी काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटच सांगितले. यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आह. अशाातच आता बच्चू कडू हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आज गुढीपाडवा दिवशी सरकारला दिला आहे.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
आज गुढीपाडव्यानिमित्त बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच सरकारने निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाचे आश्वासन दिले होते, त्यासंदर्भात एक मोठे आंदोलन उभे करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरासमोर रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन टेम्भे मशाल पेटवण्याचे आंदोलन करणार आहोत. निवडणुकीच्या वेळी सरकारने जे आश्वासन दिले होते, त्याची दखल घ्यावी किंवा टेम्भेच्या मशालीने आम्हाला पेटवून द्या, असे निर्देश सरकारला देणार आहोत. दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता हे आंदोलन करणार आहोत.
‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी
दरम्यान, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देखील आज गुढी पाडव्यादिवशी अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानाचा कोल्हापूर येथे निषेध केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदर शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले, अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली.