‘अजित पवार कसले पालकमंत्री, ते फक्त बीडला गेले. नुसती पदं भूषवायची पण काम काही करायचं नाही’, असं वक्तव्य करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला. यावेळी त्यांनी बीडमध्ये चाललंय तरी काय? असा संतापजनक सवालही यावेळी थेट सरकारला केला. बीडच्या आष्टी तालुक्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याची माहिती देत अत्यंत धक्कादायक असल्याचे दमानिया म्हणाल्या. या घटनांवर काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीत. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं, तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा होऊ लढावा. तर आता हे सगळ्या हाताबाहेर गेलेले आहे. सगळे अधिकारी सिस्टिम बदलून टाका. काही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे तिथे ती आता बदला, अशी मागणी हात जोडून दमानिया यांनी सरकारकडे केली.
