Gadchiroli Naxal गडचिरोली : संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही, अबुझमाडचा गड ढासळला आहे. गपगुमान शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा आणि आमच्यासारखं सन्मानाने जगा. असा सल्ला दिला आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडर नागसु तुमरेटीने. एबीपी माझाच्या माध्यमातून जंगलात अजून ही लढण्यास उत्सुक असलेल्या उरलेल्या माओवाद्यांना (Narayanapur Naxal Encounter) तुमरेटीने हा सुचक सल्ला दिला आहे. माओवाद्यांचा (Naxal) सर्वोच्च नेता नंबाला केशव राव मारला गेल्यानंतर माओवाद्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाल्याचे बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी तुमरेटीने यांच मुद्यांवर बोट ठेवत भाष्य केलंय.
शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत चर्चा करावी
संपूर्ण भारतात एकही स्थान आता माओवाद्यांसाठी सुरक्षित नाही. माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेला अबूझमाडचा जंगल ही आता त्यांच्यासाठी सुरक्षित गड राहिलेला नाही. तिथेच शिरून माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजूला सुरक्षा दलांनी मारले आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या उरलेल्या नेतृत्वाने परिस्थितीची जाणीव ठेवावी आणि शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत चर्चा करावी, असा सुचक सल्ला आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कमांडर तुमरेटीने दिला आहे. त्यामुळे माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नम्बाला केशवराव उर्फ बसव राजूचा मारलं जाणं, माओवादी चळवळीचा कणा पूर्णपणे मोडणारी घटना ठरल्याचे दिसून येत आहे.
माओवाद्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून योग्य निर्णय घ्यावा
माओवाद्यांकडे आता शस्त्र आणि दारूगोळा राहिलेला नाही, सुरक्षा दलांशी एन्काऊंटर झाल्यास माओवादी जास्त वेळ लढा देऊ शकत नाही. जेव्हा माओवाद्यांची एक पूर्ण कंपनी त्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव रावची सुरक्षा करू शकली नाही, तर कोणता ही माओवादी सुरक्षित नाही, हे समजून घ्यावे आणि आमच्यासारखं आत्मसमर्पण करून सन्मानाचा जीवन जगावं, असा सूचक सल्ला नागसू तुमरेटी उर्फ गिरधर या आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कमांडरने त्याच्या जंगलातील सहकाऱ्यांना दिला आहे. आता नवीन तरुण माओवाद्यांच्या दलम मध्ये सहभागी होत नाही, जनतेचा पाठिंबा माओवाद्यांना मिळत नाही, अशा स्थितीत माओवाद्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून योग्य निर्णय घ्यावा, असं ही नागसु तुमरेटी म्हणाला.
शांतता वार्तेचे प्रस्ताव देताना किमान शस्त्र खाली ठेवले पाहिजे
1980 मध्ये माओवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सुरक्षा दल जनरल सेक्रेटरीपर्यंत पोहोचले असून त्याला मारले आहे. अशावेळी माओवाद्यांनी शांतता वार्तेचे प्रस्ताव देताना आणि किमान शस्त्र खाली ठेवले पाहिजे. हातात शस्त्र घेऊन चर्चा करण्यात कुठलाही अर्थ नाही, असं ही तुमरेटी म्हणाला. एका बाजूला शस्त्र संधीचा प्रस्ताव द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हातात शस्त्र घेऊन सुरक्षा दलांशी लढा ही द्यायचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीव जात आहे, रक्तरंजित वातावरण झाले आहे, त्यामुळे उरलेल्या नक्षल कमांडरसनी योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला ही त्याने दिला आहे.