Amravati Airport : राज्यात मान्सूनने दमदार एंट्री केली पहिल्याच पावसात सर्वत्र एकच दाणादाण उडाल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान या पावसाचा फटका अमरावती विमानतळावर देखील बसल्याचे बघायला मिळाले आहे. विमानामध्ये पेट्रोल भरणाऱ्या टँकर मातीत फसल्याने अमरावती विमानतळावरुन मुंबईला जाणाऱ्या विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. मात्र ऐनवेळी उड्डाण रद्द झाल्याने अमरावती विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे बघायला मिळालंय. परिणामी यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झालाय.
विमान फेरी ऐनवेळी रद्द, विमानतळावर 74 प्रवाशांचे हाल
पुढे आलेल्या माहितीनुसार, अमरावती विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास 74 प्रवासी याच विमानाने मुंबईला जाणार होते. त्यापूर्वी अमरावती विमानतळावर टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाणार होतं. मात्र, सोमवारी पेट्रोलचा टँकर मातीत फसला. पर्यायाने नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही. सुरुवातीला पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले. याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानाखाली उतरवले. तोपर्यंत सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे त्याने प्रवाशांना सांगितले. अनेकांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. मात्र याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.
मागच्याच महिन्यात अमरावतीकरांसाठी विमानतळाचे उद्घाटन
अमरावतीकरांसाठी 16 एप्रिल 2025 या दिवशी अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. यावेळी 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालं होतं. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार होते. दरम्यान, या विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
मुरबाडमध्ये वीज पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुरबाड तालुक्यातील इंदे गावात एका 16 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. यश रमेश लाटे असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. यश दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात शोक व्यक्त होत असून या कुटुबांला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली जातेय.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..