शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेली रोकड विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासाठी गोळा झाल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात गटांगळ्या खात आहे. अर्
संजय राऊत गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विधिमंडळाची अंदाज समिती ही शासनाची जी कामे होतात, ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाहीत याचा तपास करते. त्यासंबंधीचे साक्षी पुरावे तपासते. पण ही समिती किती भ्रष्ट आहे, विशेषतः या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किती भ्रष्ट आहेत हे आता समोर आले आहे. खोतकर पूर्वी आमच्याकडेच होते. ते निष्ठेच्या आणा-भाका फार खायचे. एकनाथ शिंदे पळून गेले तेव्हा ते त्यांना उंदीर म्हणाले होते. पण त्यानंतर ते स्वतःच ईडीला घाबरून शिंदे गटात गेले. त्यानंतर त्यांना अंदाज समितीचे अध्यक्षपद भ्रष्टाचार करण्यासाठी दिले.
3 दिवसांत 5 कोटी रुपयांची कॅश जमा
ते पुढे म्हणाले, धुळे विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत मागील 3 दिवसांत 5 कोटी रुपयांची कॅश जमा झाली होती. विधिमंडळाची अंदाज समिती, तिचे अध्यक्ष अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी धुळ्याच्या दौऱ्यावर होते. तेथील ठेकेदारांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी या अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटींची रक्कम गोळा करून देण्याची जबाबदारी घेतली होती. त्यासाठी त्यांनी अंदाज समितीच्या चेअरमनच्या पाटील नामक पीएची नियुक्ती केली. त्यानुसार विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत मागील 3 दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती.
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा झाला होता. साडेपाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित 10 कोटी पुढील 2 दिवसांत जमा होणार होते, हे मी फार जबाबदारीने सांगत आहे. हे पैसे मिळाले नाही तर सर्वच ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची धमकी खोतकरांनी दिली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन असे ते म्हणाले होते, असे संजय राऊत म्हणाले.
अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झालेत का?
ते पुढे म्हणाले, हे राज्य कुठे जात आहे? आमचे स्थानिक आमदार अनिल गोटे व शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधील लोकांनी घाईघाईने टाळे लावून पळून गेले. आमची अशी मागणी होती की, जिल्हाधिकारी, एसपी व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखांनी ही खोली उघडून त्याचा पंचनामा करावा. त्यानंतर संबंधित लोकांवर कारवाई करावी. त्यासाठी गोटे तिथे अनेक तास ठिय्या मांडून बसले. पण त्यानंतरही कोणताही अधिकारी तिथे फिरकला नाही. अखेर शिवसैनिकांचा दबाव वाढल्यानंतर ते आले. त्यांनी टाळे घडले. त्यानंतर आतापर्यंत पैशांची मोजणी सुरू आहे. या प्रकरणातील इतर लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झालेत का? हे पहावे लागेल. आता सर्वजण काखा वर करतील. तो मी नव्हेच अशी भूमिका घेतील.
खोतकरांसाठी पैसे जमा झाले हे ब्रह्मदेवाने सांगण्याची गरज नाही
पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले होते हे सांगण्यासाठी आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी व सीबीआयकडे देण्याची गरज आहे. मागील वर्षभरात व त्यापूर्वीच्या अडीच वर्षात अंदाज समितीच्या कशा कशा कुठे बैठका झाल्या, आणि या पद्धतीने या पद्धतीने पैसे कसे जमा झाले, आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांनी 100 कोटींच्या वर पैसे जमा केल्याची माहिती माझ्याकडे आहे.
हे सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीतून निर्माण झाले
संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या काळातील हे आमचे राज्य आहे. अर्थमंत्री अजित पवारांच्या काळातील आपल्या महाराष्ट्राची ही अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात. गुन्ह्याचे ठिकाण सरकारी जागा, काय करत आहेत गृहमंत्री फडणवीस? त्यांच्या गृहखात्याच्या अंतर्गतच लाचलुचत प्रतिबंधक विभाग आहे. ते हा विभाग फक्त आपल्या राजकीय विरोधकांविरोधातच वापरणार का? इतरांचे काय? अर्जुन खोतकरांचे काय? त्यांना अटक करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही सच्चे असाल, तर या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः भ्रष्टाचाराने सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत आहात. कारण तुमचे सरकार या भ्रष्टाचाराच्या दलदलीतून निर्माण झाले.
सध्या भ्रष्टाचार हा विधानसभेच्या मंदिरापर्यंत पोहोचला आहे. आम्ही त्याला लोकशाहीचे मंदिर म्हणतो. पण राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हा भ्रष्टाचार बहुमताच्या चाचणीपासून सरकारी जागेत पैसे गोळा करण्यापर्यंत पोहोचला आहे. खोतकरांवर काय कारवाई होणार? हे सर्वात सांगा. या तपासाला कालमर्यादाही असली पाहिजे.
मुलुंडचा नागडा पोपटलाल कुठे गेला?
महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या चिखलात गटांगळ्या खातोय, आणखी दोन खाईल. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढत आहोत. काय करत आहे मुलुंडचा नागडा पोपटलाल? अंदाज समितीचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असता तर आतापर्यंत तो तिकडे टणाटण उड्या मारत गेला असता. तिथे उपोषणाला बसला असता. आता काय करत आहे. छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले. अंदाज समितीचा अध्यक्ष पैसे गोळा करत आहे. या समितीत अनेक महान लोक आहेत. पण हे पैसे जमा झाले अध्यक्षांसाठी हे आता उघड झाले आहे. आता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अमित शहा, फडणवीस, शिंदे करणार आहेत. ही ईडीची केस आहे. मी याविषयी ईडीला पत्र लिहिणार आहे. ईडीच्या संचालकांना ही केस कळत नसेल, तर मी त्यांना समजावून सांगेन. पण यासाठी सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.