गडचिरोली : चार दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या (Chhattisgarh Naxal) चकमकीत ठार झालेला नक्षलवादी (Gadchiroli Naxal) नेता बसवराजू सह काही नक्षलवाद्यांचे मृतदेहांवर छत्तीसगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नारायणपूर (Narayanapur Naxal Encounter) मध्ये अंत्यसंस्कार केलेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही कुटुंबीयांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर चार दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजूचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह घेण्यासाठी बसवराजूचे काही नातेवाईक आणि मोठे भाऊ नारायणपूरला गेले होते. मात्र छत्तीसगडच्या सुरक्षा दलांनी त्यांना मृतदेह दिले नाही. त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबियांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मृतदेह घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडे जाण्याची सूचना केली होती.
अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग- बेला भाटिया
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी बसवराजुसह तब्बल आठ नक्षलवाद्यांवर नारायणपूर येथील स्थानिक आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन न करता पोलिसांकडून या आठही नक्षलवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात आंध्र प्रदेशातील दोन, तेलंगणातील तीन आणि छत्तीसगड येथील तीन अशा आठ नक्षलवाद्यांवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना न देता अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग करण्यात आल्याच आरोप सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटिया यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये काटेझरीतील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा विशेष उल्लेख करत, माओवादग्रस्त भागांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. काटेझरी गावात २३ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच बस पोहोचल्याच्या घटनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले, आणि या घटनेने त्या भागातील विकासाची गाथा अधोरेखित केली. पंतप्रधानांनी सांगितले की, “मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली, अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो, त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.
“त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काटेझरी गावात पक्की सडक असूनही, लोकांना वाहतुकीची गरज असूनही यापूर्वी कधीही तिथे बस सेवा सुरू झाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे हा गाव माओवादी हिंसाचारानं प्रभावित होता. काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता या भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा दुर्गम आणि माओवादग्रस्त भागांपर्यंतही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्या आहेत, हे या घटनेतून सिद्ध होते. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मधील या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना, विशेषतः नक्षलवाद विरोधी मोहिमेला आणि त्यातून सामान्य नागरिकांना मिळत असलेल्या लाभांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.